◽ रयत समाचार ◽
पुणे (प्रतिनिधी) २४.११.२०२१
येथील इतिहास व समाज अभ्यासक भैय्या पाटील यांनी सांगितले कि, पुरंदरे यांनी अनैतिक पद्धतीने 'सुभानमंगळ' हा स्वराज्याचा किल्ला हडपला आहे. त्यांनी याबाबत काही कागदपत्रे दाखविली आहेत. ते पुढे म्हणाले की,
सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील 'सुभानमंगळ' या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई लढून हा भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्यावर स्वराज्याची पहिली लढाई लढल्याने या किल्ल्याला प्रचंड महत्व आहे. पण हा किल्ला पुरंदरे यांनी अनैतिक पद्धतीने हडपून 'हा किल्ला आता अस्तित्वात नसल्याने पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊ नये' म्हणून प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पुरंदरे यांनी सदरचा किल्ला त्यांची खाजगी मालकीची संस्था 'महाराजा प्रतिष्ठान'च्या नावाने घेतला आहे. या किल्ल्यावर आजही गढी व शिवकालीन मंदिर अस्तित्वात असून किल्ल्याचे अवशेष आजही आहेत. सदरील भुईकोट किल्ला शिंगणे जोशी देशपांडे यांच्याकडून बक्षीसपत्राद्वारे घेऊन मोठा फ्रॉड करण्यात आला.
भारतीय पुरातत्व विभागाने सदर किल्ला ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा असून त्याच्यावर मोजणी सुद्धा करू नये, म्हणून सांगितले होते पण पुरंदरे यांनी सर्वांना हरताळ फासून किल्लाच आपल्या ट्रस्ट च्या नावावर करून घेतला. सदर बाब न्यायालयात होती पण २०१९ ला लॉकडाऊनच्या कालावधीत तात्कालिन प्रांताधिकारी हाताशी धरून अनैतिक पद्धतीने हा किल्ला पुरंदरे यांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. शिवरायांनी १८ व्या वर्षी शहाजीराजे यांना आदिलशहाने कैद केले असताना हा किल्ला स्वराज्यात घेतला होता. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. पण न्यायालयात पुरंदरे यांनी जी काही बाजू मांडली आहे ती इतिहासाचा कलमकसाईच अशी बाजू मांडेल असे कोणत्याही शिवप्रेमीना वाटेल. पुरंदरे यांच्यामते हा किल्ला सध्या अस्तित्वात नाही आणि या किल्लाला कोणतेही ऐतिहासिक महत्व नाही. मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी वाटेल ते करणारे फक्त पुरंदरेच, अशी माहिती भैय्या पाटील यांनी दिली.